एका महिलेने शनिशिंगणापूर मंदिरात प्रवेश काय केला, त्यावरून गदारोळ माजला आहे. कोणाला वाटेल धर्माच्या रक्षणार्थ हा गोंधळ सुरु आहे. बाई चौथऱ्यापर्यंत पोचलीच कशी, म्हणून सात सुरक्षारक्षक निलंबित झाले. मूर्तीला दुग्धाभिषेक करण्यात आला. निषेध रैली काढण्यात आली. वास्तविक, बाई चौथऱ्यापर्यंत आल्याविरोधात प्रतिक्रिया देवाने द्यायला हवी होती. देवाने ती बाई चौथऱ्यावरच भस्मसात करुन टाकायला हवी होती. पण तसं झालं नाही. पुढेही देव त्या बाईचं काही वाकडं करेल, याची सूतराम शक्यता नाही, याची धर्ममालकांना खात्री आहे. शनिशिंगणापूरसारखा देवांचा बाजार भीतीवर, दहशतीवर उभा आहे. बाई त्या दहशतीवरच जाऊन उभी राहिली, त्यामुळे देवाच्या नावाने चाललेल्या त्या दुकानाचं अस्तित्वच धोक्यात आलंय. गदारोळाने ते अस्तित्व टिकवण्याची धडपड सुरु आहे. हळुहळू एका पाठोपाठ एक सगळ्याच दुकानांची दहशत संपत गेली, तर करोडोंच्या उलाढालीचं काय ? प्रश्न केवळ धार्मिक पाया उद्ध्वस्त होण्याचा नाही, तर त्या पायावर उभ्या राहिलेल्या जातीयवादी राजकारणाचाही आहे. निषेध रैली ही राजकीय मेंदूतूनच आलेली कल्पना. ज्यांना समाज मागे न्यायचाय, ते या संधीचा फायदा स्त्रियांना दुय्यम ठरवणारी सनातनी मानसिकता पुन्हा नव्याने घट्ट करण्यासाठी घेताहेत. पण खरंतर आधुनिकतेशी नातं सांगणाऱ्या समस्त महिलांनी या घटनेचा निषेध समस्त प्रार्थनास्थळांवर बहिष्कार करुन करायला हवा. मग ती कोणत्याही जातीधर्माची असोत !!! बाईच्या स्पर्शाचा विटाळ होतो, म्हणून लोक गाईच्या दुधाचा अभिषेक करणार असतील, तर यात बाईच्या दुधाशी केलेली बेईमानी स्पष्ट दिसते. या बेईमानीचा बदला घ्यायलाच हवा. मंदिरमशिदीदर्गे जिथे जिथे स्त्रियांना प्रवेशबंदी , दर्शनबंदी आहे, तिथला प्रवेश स्त्रियांनीच झिडकारायला हवा !!! स्त्रियांना कस्पट समजणारी कुजकट मनोवृत्ती उघड झाली. आता आपणही आपला पत्ता उघडायलाच हवा. स्त्रियांच्या शोषणाची मूळं धर्मस्थळातच लपलेली आहेत. ती तिथूनच उखडायला हवीत.
- राज असरोंडकर
कायद्याने वागा लोकचळवळ