Saturday, 3 May 2014

खर्डा घटनेच्या निमित्ताने...

नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात खर्डा गावात एका १७ वर्षीय तरुणाला अख्ख्या गावादेखत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. शाळेतून ओढत नेत शाळेच्या घंटेने त्याला मारहाण करण्यात आली. तापत्या सळईचे चटके देण्यात आले. त्याला भोसकण्यात आले. सकाळी साडेसातला सुरु झालेला क्रौयाची परिसीमा गाठणारा भयानक प्रकार दुपारी ३ वाजेपर्यंत सुरु होता. अखेर त्याचा गळा आवळून गळफास रचल्याचा बनाव रचण्यासाठी मृतदेह झाडाला लटकवण्यात आला. खर्डा गावात पोलीस चौकी आहे. पण पोलिसाला खबर लागली नाही. राजू आगे यांचा नितीन हा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या थोरल्या दोन बहिणींची लग्ने झालेली आहेत, आणखी एक धाकटी बहीण आहे. नितीनचे वडील दगडफोडीचे काम करतात तर आई मजुरी करते. नितीननेही गॅरेजमध्ये काम करून आपल्या शिक्षणाचा भार स्वत:च उचलला होता. त्याची चूक काय तर गावातील स्वतःला वरच्या जातीचे समजणाऱ्या कुटुंबातील मुलीशी तो बोलताना आढळला...!!!

१ में ला बरेच कार्यक्रम होते. सकाळी दोन कार्यक्रम....संध्याकाळी एका जवळच्या मित्राचा वाढदिवस...तयारीत त्याच उठलो होतो. सवयीने पेपर हातात घेतला. लोकसत्ता...पहिल्याच पानावर जय महाराष्ट्र ऐवजी भय महाराष्ट्र वाचलं....जस जशी बातमी वाचत गेलो...मन उदास झालं...अस्वस्थता दाटून आली. खरोखर मनातल्या उत्साहाची जागा भयाने घेतली.
नगर जिल्ह्यात घडलेले सोनई हत्याकांड अलीकडचेच आहे. तुकडे तुकडे करून युवकांना ठार करण्यात आले होते. पण जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव पाचपुते तिकडे फिरकले सुद्धा नव्हते. आताही सरकारकडून फार अपेक्षा नाहीत. आर आर पाटील हे बोलघेवडे गृहमंत्री असल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे. अलीकडच्या बहुतांशी घटनांत मराठा समाजाचे आणि त्यातही कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादीशी संबंधित लोक अशा हत्याकांडात गुंतलेले दिसून आले आहे. ह्या पक्षाचं पुरोगामित्व किती तकलादू आहे, ते वेळोवेळी दिसून आलं आहे.  माध्यमाच पण बघा, दलित युवकांच्या हत्येचं प्रकरण आहे ना, मग प्रतिक्रिया कोण देणार माध्यमांना रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर, जोगेंद्र कवाडे.....इत्यादी....मग राज ठाकरे, उध्दव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, अजितदादा, एकनाथ खडसे, माणिकराव ठाकरे यांची काय वाचा बसलीय...? अरे जातीयवादातून नका बघू, या घटनेकडे तुमच्या सोयीनुसार, पण एक १७ वर्षाचा गरीब युवक क्रूरपणे हाल हाल करून ठार मारला जातो, पक्षातर्फे साधा निषेध तरी करा...

खर्डा गाव नगर जिल्ह्यात असलं तरी बीड आणि उस्मानाबादच्या सीमेवर आहे. बीड मध्ये गोपीनाथ मुंडे आहेत. स्थानिक आमदार राम शिंदे भाजपाचे, खासदार दिलीप गांधी भाजपाचे....पण कोणीही फिरकलेले नाहीत. पालकमंत्री मधुकर पिचड १ महाराष्ट्र दिनाचं झेंडा वंदन करून गेले. पण त्यांना थोडं पुढे जाऊन आगे कुटुंबाची विचारपूस करावीशी वाटली नाही...मग पाच दिवस उलटून पोलीस पाटीलसुद्धा फिरकला नसेल, तर नवल काय..? कारण सरळ आहे...ग्राम पंचायत, पंचायत समिती राष्ट्रवादीकडे आहे. आरोपी कंपनी तिथे सत्तेवर आहे. राजकारण चालतं बहुमतावर...हल्लेखोर बहुमतात आहेत....आणि पिडीत जातीची पाच पन्नास घरं...अशावेळी पीडितांना सहानुभूती दाखवून राजकीय अवसानघातकीपणा कोण करणार..? एरव्ही एकमेकांची उणीधुणी काढणारी राजकीय मंडळी जातीयवादाच्या प्रकरणात पडद्यामागे कशी गळ्यात गळे घालून असतात, ते अशा प्रसंगात दिसतं...नगर जिल्ह्यातल्याच सोनई हत्याकांडातसुद्धा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे लोक गुंतलेले होते. पक्षाने त्यांना काढून टाकल्याचं अजून ऐकिवात नाही. शरद पवारांनी पाचपुते किंवा पिचडांना याबाबत खडसावलं असेल, असं वाटत नाही.

१ मे लाच वाल्मिकी नेते मोहन कंडारे, ओबीसी नेते उपेंद्र बोऱ्हाडे आणि मी खर्डा गावी जाऊन आलो. सांगितलं नितीनच्या वडिलांना आणि तिथे जमलेल्या युवकांना....नेते येतील आणि जातील, चार दिवस लोक सहानुभूती दाखवतील..पण आपली लढाई आपल्यालाच लढायची हे लक्षात घेऊन पावलं टाका...एफ आय आर नीट वाचून घ्या..शिकलेल्या पोरांकडून...काय राहिलंय का बघा...काय चुकीचं टाकलंय ते बघा..आणि पोलिसांना सांगून दुरुस्ती करून घ्या...वास्तविक एफ आय आर पुरेसा बोलका आहे. आता जबाबदारी पोलिसांची आहे...भक्कम पुरावे असलेलं आरोपपत्र दाखल झालं तर उपयोग...नुसतं जलदगती न्यायालय मंजूर होऊन उपयोग नाही...

नितीन आगेच्या वडिलांना मी विचारलं...त्याचे कोणी मित्र आहेत का जवळचे....तर म्हणाले, तेच होते ज्यांनी त्याला ठार मारलं...याचा अर्थ स्पष्ट आहे, प्रेम, मैत्री, माणुसकी यांच्यापेक्षा जातिवाद नव्या पिढीच्याही मनात किती खोल रुजला आहे. मुलाला मारहाण झाली ऐकल्यावर सैरभैर शोधत फिरणाऱ्या नितीनच्या आईवडिलांना ही मुले सांगतात....आम्ही हाणलाय त्याला..हाणून पाठवलाय तिकडं कान्होबा मंदिराकडं......किती हा माज...पुरोगामित्व फक्त नेत्यांच्या बोलघेवडेपणात टिकून आहे...भाषणात फुले आंबेडकरांचा विचार आणि प्रत्यक्षात मनात जातीवादी विखार...नाहीतर भाऊराव पाटलांच्या रयत शिक्षण संस्थेच्या शाळेतून एका शिकू पाहणाऱ्या हिंदू महार युवकाला फरफटत नेऊन निर्दयतेने ठार मारलं गेलं नसतं...दोनच दिवसापूर्वी त्याने आईला सांगितलं होतं, की मुलगी म्हणते, मला तूच नवरा करायचाय...पण ती माऊली म्हणाली, लेकरा आपण गरीब लोक..तू ह्या लफड्यात पडू नकोस....कदाचित हेच मुलीला सांगताना पाहिलं गेलं असावं नितीनला आणि तेच त्याच्या मृत्यूला कारण ठरलं....

नितीनचे वडील म्हणत होते, त्यांना इतकाच राग होता तर स्वतःच्या मुलीला का नाही मारलं असं हाल हाल करून...? म्हणाले, साहेब आम्हाला रस्ता दाखवा..आम्ही लढू..पण माझ्या मुलाचे मारेकरी फासावर गेले पाहिजेत...

काय सुरु आहे..? वाशिमची आंबेडकर जयंतीवरील घटना, बुलढाण्यात बेलाडला दलितांवर बहिष्कार, नगर मध्ये खर्डा गावात नितीन आगेची हाल हाल करून हत्या.....

चिंता घटनांची नाही. माणूस आहे, प्रवृत्ती आहे. जातिधर्मात माणसांची विभागणी झालेली आहे..उच्चनीचतेचा भेदभाव आहे....सत्ता असलेले आणि सत्तेपासून कोसो दूर...हल्लेखोर बहुमतात आहेत आणि पिडीत अल्पमतात. राजकारण बहुमताचं चालतं. त्यामुळे पिडीत न्यायापासून वंचित राहणार हे साहजिक आहे. त्यातही पिडीत जर संविधानिक मार्गाचा अवलंब करणारे असतील, तर मग अजूनच मानसिक कोंडी...हात शिवशिवताहेत...मन पेटून उठलेलं आहे. पण विवेक हिंसेला संमती देत नाही. अशा वेळी अधिक घुसमट होते. शिक्षणाची दारं खुली झाली खरी, पण स्वातंत्र्यानंतरसुद्धा एक पिढी लढाईतच बरबाद झाली. लढे, चळवळी हेच आयुष्य झालं होतं. आता आता कुठे आम्ही शिक्षणावर लक्ष केंद्रित केलं. जगाच्या सोबत आम्हीही धावतोय...जीवनशैली बदलतेय...राहणीमानाचा दर्जा बदलतोय...स्थिरता येतेय...

पण हे सगळं शहरात..गावाकडे काय...? सरकार नावाची व्यवस्था आहे..पण कुचकामी...आणि तिच्यातलेच लोक हल्लेखोरांना खतपाणी घालणारे असतील तर मग कुत्र्यामांजरासारखं गुमान बळी जायचं...यावेळी माध्यमांचं स्वरूप प्रभावी आणि वेगवान असल्याने सरकार हललं..आणखी एक फास्ट ट्रॅकचं आश्वासन...गेल्या जीवाची काही लाखात केलेली किंमत...कठोर शिक्षेचं गाजर...पण यापुढे बळी जाणार नाही, याची हमी...? तिचं काय..ती  कोणीच देत नाही...देणारही नाहीत..

चला, अगदी जातीयतेच्या दृष्टीकोनातून नाही, पण मानवतावादी दृष्टीकोनातून समाजाची प्रतिक्रिया अपेक्षित होती. पण माणूस आमचा मेलाय, तर आम्हीच द्यायच्या प्रतिक्रिया...कालपर्यंत बामनांना शिव्या घालायला आम्हाला सोबत घेणारे तोंडाला कुलूप लावून आहेत...आणि आता तोंड उघडलं तर आम्हाला समजावायला की आमच्या मुलींची इज्जत आम्हाला अधिक प्यारी आहे..त्यसाठी आम्ही कोणत्याही थराला जाऊ शकतो...जिथे माणुसकीचा लवलेश नाही, त्यांना शिवराय, फुले, शाहू, बाबासाहेबांचं पुरोगामित्व काय समजणार...? 

वास्तविक महाराष्ट्रातला दोन वर्गातला जातीय तणाव काही पक्षांना राजकीयदृष्ट्या परवडणारा नव्हता.  त्यामुळे महाराष्ट्रात अचानक परिवर्तनाची अत्यंत आक्रमकपद्धतीने मोहीम सुरु करण्यात आली आणि दलितांचा रोष दुसरीकडे  वळवण्यात आला...आणि मूठभरांच्या जातीवादाविरोधात महाराष्ट्रातील बहुजन वर्ग एकत्र येतोय, असं चित्र उभं करण्यात आलं...हल्ले मात्र अजूनही सुरूच आहेत......मुठ्भरात काय कमी आंतरजातीय विवाह झाले नाहीत, पण मुलगी मेली, समजून गप्प राहतात, पुढे हळूहळू नातं जुळवून घेतात, अशी कितीतरी उदाहरणे डोळ्यासमोर आहेत. पण त्यांच्याबाबतीत मानवता जिथे खाली मान घालेल अशा क्रूरतेने ठार मारल्याची उदाहरणे सापडत नाहीत...


घटना दिवसागणिक वाढताहेत...परिस्थिती चिंताजनक आहे...पिडीत अस्वस्थ आहेत...बदला घेण्याची भाषा सुरु आहे...परिवर्तनवाद्यांनी झाल्या घटनांचा स्पष्ट शब्दात निषेध विरोध करायला हवा होता...आपल्या समाजात जाऊन सामंजस्याचं वातावरण बनविण्याची प्रक्रिया सुरु करायला हवी. त्याऐवजी विषारी फुत्कार येऊ लागले आहेत...त्यांना फुत्कारांनीच प्रत्युत्तर दिलं जाऊ लागलं आहे...शिक्षणाकडे वळलेला नवयुवक पुन्हा लढाईच्या मैदानात उतरण्याच्या मानसिकतेत येऊ लागला आहे...आणखी एक पिढी जातीय व्यवस्थेची बळी होऊ पाहत आहे....अशा घटना घडल्या की संतापाची लाट समाजात येते. हिंसक प्रतिक्रिया दिल्या जातात. आमच्यासारखे लोक समाजाला प्रत्येक वेळी शांत करण्याचा प्रयत्न करतात. हा बाबासाहेबांच्या चळवळीचा मार्ग नाही, म्हणून आम्ही लोकांना कळकळीने सांगतो. संविधानिक मार्गांचा अवलंब करून न्याय मिळवण्याचा प्रयत्न करतो. पण ज्यांच्यावर मागासांच्या संविधानिक हक्कांचे संरंक्षण करण्याची जबाबदारी आहे, त्यांची भूमिका संशयास्पद आहे. कमजोर आहे. अशा वेळी भविष्यकाळात हिंसक मार्गांचाच पुरस्कार करणाऱ्यांनी ह्या चळवळीचा पुन्हा एकदा ताबा घेतला तर आश्चर्य वाटायला नको. सरकारला तेच अपेक्षित आहे की काय..कळत नाही. .. अजूनही वेळ गेलेली नाही. लोक ऐकून घेण्याच्या पलीकडे जायच्या आधी सरकारचं अस्तित्व दिसायलाच हवं....अशा घटना हाताळण्यासाठी सीबीआय च्या धर्तीवर पोलिसांचा स्वतंत्र विभाग आणि स्वतंत्र न्यायालय हवं...जेणेकरून संविधानिक न्यायाची प्रक्रिया वेगवान होईल....हे सगळं घडतंय की घडवलं जातंय....कोणी पडद्यामागून सूत्रे हलवतंय का..? थोडं थांबून शांतपणे विचार करावा लागेल...आपल्या सभोवताली काय चाललंय नीट समजून घ्यावं लागेल...चक्रव्यूह भेदायचा असेल, विचारपूर्वकच रणनीती आखावी लागेल...

Sunday, 6 April 2014

सोनियांचा सुसंस्कृतपणा

१९६५ च्या सुमारास सोनिया गांधी आणि राजीव गांधी यांची भेट झाली होती. भेटीचे रुपांतर प्रेमात आणि पुढे नात्यात झालं. पण ते दोघेही राजकारणापासून दूरच होते. राजीव गांधींना पायलट कामात रस होता. आणि सोनिया एक गृहिणी होऊन कुटुंबात वावरत होती. मुले राहुल आणि प्रियांका....छोटे कुटुंब, सुखी कुटुंब...संजय गांधींच्या अकाली मृत्युनंतरही राजीव आणि सोनिया यांनी राजकारणात रस दाखवला नव्हता. पण १९८४ ला इंदिरांजींची हत्या झाली आणि परिस्थितीने राजीव गांधींना राजकारणात खेचून आणलं. स्वाभाविकपणे सोनिया गांधी राजकारणात वावरू लागल्या. राजीव गांधींनी देशाच्या आधुनिकतेवर लक्ष केंद्रित केलं.

आज ज्या माध्यमांचा वापर करून नवयुवक नेहरू गांधी घराण्याची खिल्ली उडवतोय, ती माध्यमे राजीव गांधींच्या नवविचारांची देण आहे , हे विसरून चालणार नाही. सरकारी योजनांतील भ्रष्टाचारावर थेट भाष्य करण्याचं धाडस राजीव गांधींनी दाखवलं. त्यांच्या कार्यकाळात भारत प्रगतीची घौडदौड करत असतानाच तामिळी वाघांनी त्यांची हत्या घडवून आणली. अत्यंत क्रूरपणे राजीव गांधीचा खून करण्यात आला. पण सोनिया किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी या देशाविरोधात किंवा देशवासीयांविरोधात ब्र काढला नाही. कॉंग्रेसने त्यावेळी सोनियांना पंतप्रधान होण्याबद्दल विचारलं होतं. पण त्यांनी नम्रपणे नकार दिला.

९७ च्या दरम्यान त्या कॉंग्रेस जणांच्या आग्रहाखातर राजकारणात आल्या. अटलबिहारी वाजपेयींच्या सरकारात त्यांनी आक्रमक परिणामकारक विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावली आणि  देशाची सत्ता पुन्हा कॉंग्रेसकडे खेचून आणली. कॉंग्रेस पक्षाच्या इतिहासात सर्वाधिक काळ अध्यक्षपदी राहण्याचा मान त्यांच्याकडे आहे. फोर्ब मासिकाच्या जगातील प्रभावशाली व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तीच्या यादीत सोनिया गांधींचा समावेश आहे. भारतात त्यांची, त्यांच्या राजकारणाची, त्यांच्या भाषेची नेहमीच खिल्ली उडवली गेली. गुंगी गुडिया म्हणून त्यांना हिणवलं गेलं. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासोबत त्यांची उघडीनागडी आक्षेपार्ह बनावट छायाचित्रे बनवून पद्धतशीरपणे देशभर पसरवण्यात आली. त्यांच्यावर घाणेरड्या पातळीवर जाऊन विनोद तयार करण्यात आले. देशाच्या राजकारणात इतक्या खालच्या पातळीवरचं राजकारण कधीच झालेलं नव्हतं. त्यामागच्या सडक्या बुद्धीची प्रेरणा कुठून होती, हे सर्वश्रुत आहे. पण देशातील सर्वोच्च प्रभावशाली व्यक्ती असतानाही त्यांनी असे करणाऱ्यांचा पिच्छा पुरविण्यासाठी सरकारी ताकद वापरली नाही की कोणाशी सूडबुद्धीने वागल्या नाहीत.

इतक्या वर्षात सोनिया गांधींनी कोणाही राजकीय नेत्याविरोधात वैयक्तिक टीका केलेली नाही, की आक्षेपार्ह शब्दांचा, भाषेचा वापर केला नाही. देशाचा माजी पंतप्रधान असलेल्या व्यक्तीच्या मारेकऱ्यांचा याचं देशात उघड पुरस्कार झाला. पण सोनिया गांधी त्याविरोधातही बोलल्या नाहीत. इथल्या मातीशी एकरूप होऊनही, राहूनही त्यांच्या वाट्याला नेहमीच उपेक्षा आली. एक एकाकी लढणारी विधवा इथल्या तथाकथित संस्कृतीरक्षकांच्या चेष्टेचा विषय बनली. वास्तविक तिचं स्त्रीत्व आणि त्याहीपेक्षा तिचं वैधव्यच या कुजकट मानसिकतेच्या तथाकथित संस्कृतीरक्षकांच्या डोळ्यात खुपलं असेल, हे आपण लक्षातच घेत नाही.

धर्मांधतेला धर्मांधतेने उत्तर देऊ पाहणारे, निष्पाप बालकांना जिवंत जाळणारे, स्त्रियांच्या पेहरावांचे नियम बनवणारे, त्यांच्या घराबाहेर जाण्याच्या आणि घरात परतण्याच्या वेळा ठरवणारे, स्त्रियांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचार, बलात्काराला तिलाच दोषी ठरवणारे, पंचायंतीच्या माध्यमातून स्त्रियांना विटंबित करण्याची सजा सुनावणारे, आंतरजातीय विवाह केला, म्हणून पोटच्या पोरींना क्रूरतेने ठार मारणारे हे तथाकथित संस्कृतीरक्षक एका विधवेला सर्वोच्च सत्तास्थानी स्वीकारू शकतच नव्हते. पोटदुखी तीच आहे. भ्रष्टाचार हा एक बहाणा आहे. पक्षीय घटनेत समाजवाद, गांधीवाद, समतावाद आणि प्रत्यक्षात वावरताना धर्मांधतेला राष्ट्रीयत्वाचा मुलामा चढवून माणसामाणसांना जातीधर्माच्या नावावर भिडवून एनकेनप्रकारे सत्तेत येण्याचे मनसुबे असलेले लोक परिवर्तनाच्या बाता मारतात, तेंव्हा हसू तर येतंच, पण त्यापेक्षा जास्त चिंता वाटते. भारताचा येणारा भविष्यकाळ काय असेल. येणाऱ्या काळात स्त्रियांची, मागासांची, अल्पसंख्याकांची स्थिती काय असेल..याची कल्पना करून मन धास्तावतं.

सोनिया गांधींची सत्ता गेली, त्याचं इथे कोणाला वाईट वाटण्याचं कारण नाही. राजकारणात असे चढउतार येत असतात. आत्मचिंतनासाठी ते आवश्यक सुद्धा असतात. पण जाणाऱ्यांच्या जागी येतंय कोण, ते जास्त महत्वाचं आहे. तिथे येण्यासाठी आणि येईपर्यंत राजनीतिक संकेत, नितीमत्ता ज्याप्रमाणे पायदळी तुडवली गेली, सुसंस्कृतपणाच्या चिंधड्या केल्या गेल्या, खोटारडेपणाचा कळस केला गेला, तेच लोक संस्कृतीरक्षक म्हणून वावरताहेत. उज्ज्वल भारताचे स्वप्न दाखवताहेत. चिंता त्याची वाटत्तेय. विदेशी म्हणून जिला सतत हिणवले गेले, तिने जितका सुसंस्कृतपणा जपला, त्याच्या टक्काभरसुद्धा सुसंस्कृतपणा नसलेली माणसे बदलाची भाषा, देश घडवण्याची भाषा करताहेत, चिंता त्याची वाटतेय.