Tuesday, 1 November 2016

बाकीच्या कलमांचं काय झालं ?

आयुक्तांची बदली करा, अन्यथा कायदा बदला, अशा शब्दांत शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खडसावलं आहे म्हणे...कायद्यात जर आयुक्तांवर अविश्वासाची तरतूद आहे, तर तुकाराम मुंढेंची बदली झालीच पाहिजे, ही ठाकरेंची मागणी !!! मूळात, शिवसेनेचा नि कायद्याच्या अमलबजावणीचा संबंध काय, हा मूलभूत प्रश्न आहे. जणू काही कायदे पायदळी तुडवण्यासाठीच शिवसेनेचा जन्म झाला आहे, अशी या पक्षाची आजवरची वाटचाल आहे. बेशिस्तीला जातीधर्माचं, प्रांतवादाचं कोंदण देत शिवसेनेनं तिचं वेळोवेळी समर्थन केलं आहे. बुचकळ्यात टाकणारा भाग असा की नवी मुंबई महानगर पालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीची सत्ता असताना त्या पक्षाऐवजी शिवसेनेच्याच जोरबैठका अधिक सुरू आहेत. बेगाना शादीमें, अब्दुल्ला दिवाना, असा हा प्रकार आहे. गणेश नाईक आणि शिवसेना यांचं विळ्याभोपळ्याचं राजकीय वैर, पण आयुक्त मुंढेंच्या विरोधात दोघे गळ्यात गळे घालून आहेत. म्हणूनच राष्ट्रवादीच्या पाठींब्यावर महापौर झालेले सुधाकर सोनवणे मातोश्रीवर दाद मागायला जातात. कुठलाही सामाजिक अजेंडा नसलेले राजकीय पक्ष समान स्वार्थासाठी कशी एकजूट दाखवतात, त्याचं नवी मुंबई महानगर पालिका हे आणखी एक उदाहरण !!! मुंढेंना हटवण्यासाठी गणेश नाईक, सुनील तटकरे, शरद पवार यांना दगदग करू न देता, उध्दव ठाकरेंनी पुढाकार घेतला आहे. आता काम वाजवायचंच म्हटलं, तर युक्तीवाद हवाच !!! म्हणून आयुक्त बदला किंवा कायदा बदला, असा पेच ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांपुढे टाकला आहे. पण उध्दव ठाकरेंना कोणीतरी सांगायला हवं की महापालिका कायद्यात फक्त आयुक्तांवर अविश्वास आणण्याचं एकच कलम नसून आणखीही पाचशे कलमे आहेत, त्यांच्या पालनाचं काय ? शिवसेनेची सत्ता असलेल्या कोणत्या महापालिकेत अधिनियमानुसार कायदेशीर कारभार सुरू आहे ? जर नगरसेवक कायद्याचं पालन करत नसतील तर महापालिका बरखास्त करून या नगरसेवकांनाच का बदलू नये ?

No comments:

Post a Comment