महाराज आम्हाला माफ करा !!!
_________________________
आपल्या विरोधात लिखाण करणाऱ्याचा सन्मान केलात, तर महाराष्ट्रभर आंदोलने होतील, असा कडक इशारा आम्ही प्रत्यक्षात आणू शकलो नाही, कारण रबर किती खेचायचा, ते आधीच ठरलं होतं महाराज. म्हणूनच आम्ही आदराची, विरोधाची, गोंधळाची आणि सामंज्यस्याचीही भुमिका घेतली होती महाराज. त्याचं श्रेय त्यांचं त्यांनी आणि आमचं आम्ही घ्यावं, हे पूर्वनियोजितच होतं महाराज.
साडेतीनशे वर्षांपूर्वी स्वराज्याचं स्वप्न साकारलं होतंत तुम्ही. आज आपलीच माणसं गुलामीत आहेत. विकासाच्या आम्ही फक्त बाताच मारल्या. प्रत्यक्षात ६० हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी गेल्या दहा वर्षात आत्महत्या केल्या महाराज.
शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे प्रतिनिधी विधीमंडळात पाठवता येत नाहीत महाराज. खूप पैसा लागतो महाराज निवडणुका लढवायला. महाराष्ट्रातून निवडून निवडून गुंड, व्यापारी, धनदांडगे यांना तिकीटं द्यावी लागली महाराज. जमीनदार, वतनदार आणावे लागले महाराज पुन्हा. पण हे सगळं तुम्ही आणलेलं स्वराज्य टिकवण्यासाठीच आम्ही केलं महाराज. आम्ही टिकलो, तरच स्वराज्य टिकेल ना महाराज !!
आपल्या महाराष्टाला पुरोगामी विचारांची परंपरा महाराज. अंधश्रध्दांच्या विरोधात रान उठवणारी संत परंपरा लाभलीय आपल्याला महाराज. पण लोकांची फसवणुक होतेच आहे. बायाबापड्या नाडल्या, लुटल्या जाताहेत. तरीही कायदा करण्याची आमची हिंमत झाली नाही महाराज. त्यासाठी दाभोलकरांना मरावं लागलं. आपला खरा इतिहास सांगणाऱ्या पानसरेंचाही खून झाला. त्यांचे खूनी अजूनही पकडले गेलेले नाहीत. पण आम्ही त्याविरोधात महाराष्ट्रात सभा घेतल्या नाहीत. त्याऐवजी आम्ही आपला खोटा इतिहास सांगणाऱ्यांना चर्चेत आणलं. त्यांच्या समर्थकांना पध्दतशीर एकवटण्याचं काम केलं. सन्मानसोहळ्यापूर्वी त्यांना भरघोस पाठींबा मिळवून दिला महाराज. करायला गेलो एक आणि झालं भलतंच महाराज !!!
आपण ज्या मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य मिळवलंत, त्यांना आजही सामाजिक न्यायासाठी लढावं लागतं. जातिपातीवरून माणसं मारली जातात, जाळली जातात, कापली जातात, स्त्रीयांची सामुहिकरित्या अब्रु लुटली जाते, पण यातलं काहीच रोखू शकलो नाही महाराज. आम्ही मागासांचे जात दाखले मिळवण्याचे नियम आणखी कडक करून टाकले महाराज.
स्त्री ती कोणत्याही समाजाची असो, तिला सुरक्षित सामाजिक वातावरण आम्ही देऊ शकलेलो नाही. स्त्रीया आजही स्वराज्याच्या, स्वातंत्र्याच्या प्रतिक्षेत आहेत. युवक बेरोजगारीने हैराण आहेत. शिक्षणाचं बाजारीकरण झालंय. लोक मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत. सगळीकडे भ्रष्टाचार, अनागोंदी माजलीय.
आम्ही सत्तेत असताना महाराष्ट्र फक्त लुटला महाराज. आता सत्ता नसताना आम्ही फक्त राजकारण करू शकतो महाराज. कधी आमच्या, कधी त्यांच्या सोयीचं महाराज. आम्ही आपला अपमान करणाऱ्यांना रोखू शकलो नाही महाराज.
महाराज, आम्हाला माफ करा !!!!
- राज असरोंडकर
9850044201
No comments:
Post a Comment