तर साहेब ....
ठाण्यात कारचालकाच्या अपघातात एक वाहतूक पोलीस मृत्यूच्या दाढेतून परतला..
झालं काय ....
शनिवारी, ३ सप्टेंबर रोजी ठाण्यात तीन हात नाका इथे कर्तव्य बजावत असताना वाहतूक पोलिस नरसिंग महापुरे यांनी एका नो एन्ट्रीत विरूध्द दिशेने भरधाव जाणाऱ्या कारला अडवण्याचा प्रयत्न केला.
त्या निरागस , सालस , कूकल बाळ , नादान आणि भोळ्या असलेल्या "योगेश भामरे " या हिंदू तरुणाकड़े लाईसन्सदेखील नव्हतं. महापुरे गाडी थांबवण्याच्या प्रयत्नात असताना भामरे याने सरळ त्यांच्या अंगावरच गाडी घातली व जवळजवळ अर्धा किमी पर्यंत महापुरेंना फरफटत नेलं. गाडीच्या बोनेटला धरून राहिल्याने महापुरेंचा जीव वाचला. योगेश भामरेला पोलिसांनी अटक केली आहे.
हिंदुत्ववादाला धक्का लागेल, असं काहीच नाही करायचं ठरवलं आहे. जय महाराष्ट्र .... शान्तिप्रिय समाजाच्या हातूनही चुकून अशा घटना घडू शकतात .... या जागी कार्यकर्ते मुस्लिम किंवा दलित संघटनांचे असते तर आता पर्यन्त सनातन आणि हिंदुत्ववादी लोकांनी सरकारी व्यवस्थेची आणि संघटनेची आबरू काढण्यासाठी जीभेला चाक़ू धार आणली असती .... ठाण्यात मोर्चा काढला असता. पण हा काही अहमद महंमद अली कुरेशी नाही, हिंदू आहे, म्हणून कोणीच राजकीय नेता ब्र काढत नाही ...आता यांच्या जबड्याला आणि हाताला लकवा मारला आहे.
नरसिंग महापुरे यांना दीर्घायुष्य लाभो !!!
अशी पोस्ट आपण ठाण्यातील घटनेसंदर्भात फिरवली तर ...
त्यासारखा दुसरा मूर्खपणा नाही. क्षणिक धार्मिक भावनेच्या भरात येवून अशा घटनांचं मूल्यमापन करताच येत नाही. कारण या घटना धार्मिक विद्वेषातून घडलेल्या नाहीत. त्या अपघातीही नाहीत. तर हेतूत: घडवलेल्या आहेत, माजोरड्या प्रवृत्तीतून. ही प्रवृत्ती नियम-कायद्यांचा, संविधानिक व्यवस्थेचा अनादर करणारी आहे आणि जातधर्मभाषाप्रांतापलिकडे सर्व भारतीयांत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी इशारा दिला होता की असंविधानिक मार्गांचा अवलंब वाढला तर देशात अराजक माजेल.
आज देशात वेगळी परिस्थिती काय आहे ? अराजकच आहे !!! कोणीही सोमेगोमे उठतात आणि कायदा हातात घेतात. संविधानिक व्यवस्थेला आव्हान देतात. शहाबानो प्रकरण असो की अगदी अलिकडचा दहीहंडीबाबतचा किंवा मशिदींवरील भोंग्यांबाबतचा, मंदिर-मस्जिद प्रवेशाबाबतचा मा. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असो, त्यांचा खुला अनादर केला जातो, कायदा मोडणाऱ्यांना गौरवलं जातं, दोनचार मतांच्या लालसेपायी इथली अख्खी तरूण पीढी भरकटवली जाते. सण, उत्सवांच्या नावाखाली धार्मिक उन्मादाला उत्तेजन देताना, समाजात धार्मिक विद्वेष पसरवून स्वार्थी आणि अनेकदा सवंग लोकप्रियतेचं तोडफोडीचं राजकारण करताना राजकीय पक्षच नियमकायद्यांना फाटा देत असतात. त्यातूनच पोलिसांवर, सरकारी अधिकाऱ्यांवर, डॉक्टरांवर, शिक्षकांवर हल्ला चढवणारी माजोरडी प्रवृत्ती जन्म घेते.
गेल्या सहा महिन्यांत महाराष्ट्रात घडलेल्या पुढील घटना पाहा...
*१९ फेब्रुवारी,२०१६*
लातूरमधील पानगावात शिवजयंतीच्या निमित्ताने भगवा झेंडा फडकवण्यास विरोध केलेल्या पोलिसांना मारहाण केल्याची घटना घडली असून याप्रकरणी १७ जणांना अटक करण्यात आली असून त्यात अल्पवयीन तरुणांचाही समावेश आहे.
*१ जुलै, २०१६*
नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात आरोपींकडून पोलिसांना मारहाण केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. खासगी गाडीतून नेण्याची मागणी करत आरोपींनी दोन पोलिसांना जोरदार मारहाण केली असून या मारहाणीत पोलीस गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपींना न्यायालयात हजर करण्यासाठी त्यांना गाडीतून घेऊन निघालेल्या पोलिसांनाच नाशिकमध्ये सात कैद्यांनी मारहाण केली.
*२९ फेब्रुवारी, २०१६*
विरारमध्ये चार महिला पोलिसांना स्टेशनमध्ये घुसून मारहाण केल्याची घटना घडली आहे. अर्नाळा सागरी पोलिस स्टेशनमध्ये ही दोन बहिणींनी पोलिसांना मारहाण केली. प्रज्ञा सिंह आणि गार्गी सिंह अशी या आरोपी महिलांची नावं आहे.
*२२ डिसेंबर, २०१५*
डोंबिवली एमआयडीसीतील बेकायदा इमारत तोडण्यास गेलेल्या एमआयडीसीच्या अभियंत्याला भाजपचे नगरसेवक महेश पाटील व त्यांच्या समर्थकांनी बांधकाम तोडण्यास मज्जाव करून मारहाण केली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मध्यस्थी करणाऱ्या पोलिसांनाही या मारहाणीचा फटका बसला.
*५ ऑगस्ट, २०१६*
वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस हवालदार महिलेला मारहाण आणि विनयभंगाचा प्रकार काही दिवसांपूर्वीच घडलेला असतांना ठाण्यातील उपवन भागात दोन मद्यपी तरुणांनी चार वाहतूक पोलिसांना शिवीगाळ करुन मारहाण केल्याची घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी रोहन राजीवडे आणि सागर मांडवकर यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणणो, पोलीसांना मारहाण करणो यासह विविध कलमांखाली वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*२५ ऑगस्ट, २०१६*
बारामतीतील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या आवारात विनापरवाना वाढदिवस साजरा करण्याचा प्रयत्न करणार्या तरुणांच्या टोळक्याला रोखण्यासाठी गेलेल्या तीन पोलिसांना या टोळक्याने जबरदस्त मारहाण करत गंभीर जखमी केले. हा प्रकार बुधवारी (दि.24) सकाळी सव्वादहा वाजण्याच्या सुमारास घडला. यामध्ये सहाय्यक फौजदार अर्जुन तुकाराम व्यवहारे, कॉन्स्टेबल व्ही. एस. वाघमोडे व राजेश साहेबराव गायकवाड हे पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले.
*६ जून, २०१६*
वाशीतील इनॉर्बिट मॉलमधील पबमध्ये पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणींच्या दोन गटांमध्ये किरकोळ कारणावरून वादावादी होऊन हाणामारीची घटना घडली. या घटनेनंतर मद्यधुंद तरुणींनी वाशी महिला पोलिसांना धक्काबुक्की केली. यात महिला पोलिस किरकोळ जखमी झाल्या आहेत.
*२९ सप्टें, २०१५*
औरंगाबादमध्ये ‘नो पार्किंग’मधील रिक्षा काढण्यास सांगितल्याच्या कारणावरून रिक्षा चालकासह त्याच्या भावाने दोन पोलिसांना दगडाने मारहाण केली. त्यानंतर स्वतःच रिक्षा पेटवून दिली. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून, अन्य एका आरोपीचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
*२० फेब्रुवारी, २०१६*
पुणे येथील खडक पोलीस ठाण्यात चौकशीच्या पोलिसांनाच धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडला आहे. त्याचसमवेत सहकारनगर भागात वाहतुकीचे नियम मोडून एकाच दुचाकीवर तीन तरुण जात होते. त्यांना अडवणार्या वाहतूक पोलिसालाच शिवीगाळ करून धमकावल्याची घटना घडली आहे. या दोन्ही घटना २० फेब्रुवारी या दिवशी घडल्या आहेत.
*२५ जून, २०१६*
औरंगाबाद - कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या जनावरांचा ट्रक अडवून गोशाळेत नेणाऱ्या पोलिसाला जमावाने बेदम मारहाण केली. इतकेच नव्हे तर ट्रक सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या अंगावर घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्नही करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सिल्लोडच्या नगरसेवकासह ४० आरोपींविरोधात सिल्लोड शहर, ग्रामीण, आणि वडोद बजार पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*१० फेब्रुवारी, २०१६*
किरकोळ कारणावरून पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांना मारहाण केल्याप्रकरणी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचा पुतण्या सत्यशील याच्यासह त्याच्या 9 साथीदारांना आज अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
*शहीद विलास शिंदे प्रकरणात मोर्चा काढणाऱ्या पोलिसांच्या कुटुंबियांकडून या सर्व घटनांची नोंद घेतली गेली आहे काय ? आपण गुन्हेगारी प्रवृत्तीच्या विरोधात बोलणार आहोत की विशिष्ट जातीधर्माच्या ?*
शेवटी कुठवर आपण स्वत:ची फसवणूक करून घेणार आहोत. *या गुन्हेगारी प्रवृत्ती त्यांचे जातधर्म भेद विसरून हातात हात घालून आपल्या घरात शिरेपर्यंत ?????*
*राज असरोंडकर*
कायद्याने वागा लोकचळवळ
No comments:
Post a Comment