Tuesday, 5 December 2017

आम्ही अजूनही नाॅन-हिंदूच!!!

माझे आजोबा फौजदार होते. तुकाराम फौजदार म्हणून त्यांची अख्ख्या मालवणात ख्याती होती. जोपर्यंत आजोबांनी बाबासाहेबांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन धर्मांतर केलं नव्हतं, तोपर्यंत त्यांची हजेरी तालुक्याला तुकनाक म्हार अशी लागायची. एक दिवस मात्र आजोबांनी अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले, आम्ही आता म्हार राहिलेलो नाही. आम्ही बौद्ध आहोत. अधिकारी म्हणाले, मग आडनावाचे काय...? आजोबा म्हणाले, आम्ही असरोंडी गावचे. आम्हाला असरोंडकर म्हणा. आणि आम्ही असरोंडकर झालो. माझ्या वाडवडिलांचा जन्म हिंदू धर्मात अस्पृश्य समजल्या गेलेल्या म्हार जातीत झाला. पण माझा जन्म बौद्ध म्हणून झाला. बाबासाहेबांच्या धर्मांतरामुळे ते होऊ शकले. जगातला महान असा धम्म मला अनुभवायला मिळाला. म्हणजे नेमकं काय झालं, त्याचा विचार मी अलीकडे थोडीफार अक्कल येऊ लागल्यावर करू लागलो. तेंव्हा मला जाणवले, बाबासाहेबांनी धर्मांतरावेळी काही प्रतिज्ञा दिल्या होत्या. त्यातला काही प्रतिज्ञा हिंदू धर्माच्या त्यागासंदर्भात होत्या. तर काही बौद्ध धर्माच्या पालनासंदर्भात होत्या. एक धर्म सोडून दुसरा स्वीकारण्याची समांतर प्रक्रिया होती, त्या प्रतिज्ञा म्हणजे. पण सोडून देणं तसं सोपं असतं, स्वीकारणं कठीण...त्यातही बौद्ध धम्माचं पालन...कठीणच...मग हिंदू धर्माच्या त्यागावर अधिक जोर दिला गेला आणि धम्माच्या पालनात तडजोड केली गेली. त्यांची वास्तुशांती , आपला गृहप्रवेश, त्यांचा बारसा, आपले नामकरण, त्यांचा विवाह, आपला परिणय, त्यांच्यात श्रीमान , आपल्यात आयुष्यमान, त्याचं पंचामृत, आपली पाच फळे, त्यांचा आंबा, आपला  पिंपळ, त्यांचा कलश, आपला तांब्या...त्यांची मंगलाष्टके आणि आपली अष्टमंगलगाथा, त्याचं तेरावं, आपला जलदान विधी, त्याचं श्राद्ध नि आपलं पुण्यानुमोदन...त्यांच्यात आणि आमच्यात फक्त एक पुसटशी रेषा...पौरोहित्य तिथेही आणि इथेही.. म्हणून आजही पंचशील घेऊन हळदीला सुरुवात करतात...!!! मानसिकता तीच...धारणा तीच...अभ्यासक्रम तोच , शाळा वेगळ्या, युनिफॉर्म वेगळा, माध्यम वेगळं....आम्ही फक्त प्रतिक्रियावादी झालो,असं वाटतं अनेकदा...बौद्ध धम्म उरला फक्त शाळा सोडल्याच्या दाखल्यावर, जात प्रमाणपत्र आणि भिंतीवरल्या फोटोत...वर्तणुकीत तो उतरलाच नाही...इथे मला कर्मकांड, विधी, सोपस्कारवाला धम्म अपेक्षित नाही..तर बुद्धाच्या शिकवणुकीचे प्रत्यक्ष जीवनात पालन करणारा धम्म अपेक्षित आहे..भूतदया, सहनशीलता, सहिष्णुता, प्रेम यांचा अंगीकार करणारा धम्म अपेक्षित आहे..पण धर्मांतरित होऊन ६० वर्षे होत आली, आम्ही अजूनही नॉन-हिंदुच आहोत...बौद्ध बनण्याच्या धडपडीत असलेले, पण मिळालेली वाट हरवलेले...

No comments:

Post a Comment