तुमच्या पत्नी तुमच्यासाठी शेती आहेत, असं धर्मग्रंथात सांगणारे टोपीधारी आणि जास्तीत जास्त मुलं जन्माला घाला, म्हणणारे टिळेधारी, एरव्ही एकमेकांचे कट्टर दुश्मन असतात. सातत्याने एकमेकाच्या विरोधात विद्वेषपूर्ण बोलून दोन्ही बाजूंची आपापली सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि या सगळ्याच्या आधारे आर्थिक दुकानं व्यवस्थित सांभाळतात. एकप्रकारे पडद्यामागे ते परस्परपूरक सहकार तत्व बाळगून चालत असतात. बुध्दीबधीर अनुयायी यांची प्यादी असतात. इतर सर्व बाबतीत, यांच्यात कितीही शत्रुत्व दिसून येत असलं तरी, स्त्रियांच्या दुय्यमत्वाबद्दल त्यांच्यात कमालीचं एकमत आहे. कोणाचा बुरखा हा धर्मादेश असतो, तर कोणाचा घुंघटा समाजाची शान बनतो. कोणाला दर्ग्यात प्रवेश नसतो, तर कोणाला मंदिरात!!!ऋतुस्त्रावाबाबत दोन्हीकडच्या धारणा सारख्याच आहेत. त्या काळात दोन्हीकडे ती बाहेरचीच असते. जे काही लाज, लज्जा, संकोच, मर्यादा आहेत, त्या स्त्रीयांच्याच वाट्याला आहेत. त्यांना रूढी, परंपरा, तथाकथित संस्कृतीचं कोंदण आहे आणि त्या सगळ्याचं नियमन होतं, धर्माचरणाने. धर्मांची अनेक नावे आहेत, अनेक रूपे आहेत, पण जातधर्मभाषाप्रांतापलिकडे समस्त महिलांचा एकच धर्म, गुलामी-परावलंबित्व, दुयमत्त्व अधोरेखित करणारा!!! स्त्रीयांचे म्हणून जे जे काही कौटुंबिक, सामाजिक, राजकीय प्रश्न आहेत, त्यांचं मूळ धर्म आहेत!!! या धर्मांचा पगडा जोवर जगातल्या समस्त महिला उखडून फेकून देत नाहीत, तोवर माणूस म्हणून त्यांच्या स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव त्यांना होणं शक्य नाही!!! अन्यथा, कितीही शिकल्या, सवरल्या, नेत्या झाल्या तरी पुढील हजारों वर्षे त्यांची ओळख पुरूषांची शेती अशीच राहील, हे निश्चित!!!
No comments:
Post a Comment