Wednesday, 20 May 2015

अपूर्णाकाकू !!!

तोकड्या कपड्यात
हरवलंय ब्राम्हण्य ???

अपर्णा रामतीर्थकर यांना
चिंतेने झोप नाही !!!
________________________________________________________मुलीला आपण मुलांसारखं वागवूच शकत नाही. मुलांना तरी भान असतं, पण मुलींना नसतं, असं अपर्णा रामतीर्थकर ठामपणे सांगतात.

आता ह्या रामतीर्थकर कोण ? भारतीय संस्कृतीच्या कट्टर पुरस्कर्त्या आहेत त्या. एकत्र कुटुंबपध्दती टिकावी म्हणून धडपडत असतात. ठिकठिकाणी जाऊन भाषणं करतात. सनातनवाद्यांचा त्या "बोलका पोपट" आहेत, असं सुधारणावादी म्हणतील. पण मुलगी शिकून काय करणार, असं जिच्या आईने लहानपणापासून शिकवलं आहे, तिच्याकडून फाजील अपेक्षा कशाला कराव्यात ? "आई" होऊनच अपर्णा ताई भाषणं करत असल्याने त्यांची भाषा त्यांच्या आईची आहे.

मुली तोकड्या कपड्यात वावरतात, याचा अपर्णाबाईंना खूप राग आहे. हल्ली उघड्या राहणाऱ्या मुलींमध्ये ब्राम्हण मुलींची संख्या जास्त आहे, याची भयंकर चिंता अपर्णावहिनींना आहे. त्याचं कारण, त्यांना लाज नाही, असं अपर्णाआजी म्हणतात. मुलींच्या आईलाच कपड्यांचं भान नसेल, तर मुलींना कुठून येणार, कशात मोजायचं तुमचं ब्राम्हण्य, असा रोखठोक सवाल त्या करतात. मुलींच्या बेछुट वागण्याला आई जबाबदार आहे, कारण ती मुलींना काही शिकवत नाही. असं त्यांचं म्हणणं.

शिक्षणामुळे मुलींमध्ये इतका आगाऊपणा आला आहे, असं अपर्णामावशींना वाटतं. मुलींचं लग्न करायचं असेल, तर त्यांना पाय जमीनीवर ठेवायला शिकवा, असा सल्ला अपर्णाआत्या देतात.

अपर्णादीदी भारतीय संस्कृतीच्या संवर्धनाचं काम करतात. त्यांच्या मते उंबरा हीच स्त्रीयांसाठी भारतीय संस्कृती आहे. उंबरा म्हणजे मर्यादा, असं त्या उघडपणे सांगतात. मुलगी म्हणजे कुटुंबाचा विश्वास आहे, कुटुंबाची प्रतिष्ठा आहे. बापाला समाजात ताठ मानेने चालता आलं पाहिजे, असं मुलीचं वर्तन हवं, यावर अपर्णानानी जोर देतात.
____________________________________आता प्रश्न इतकाच आहे की सुधारणावाद्यांनी उंबरा संस्कृतीला विरोध केला नसता, तर अपर्णामैडम त्या सनातन संस्कृतीचं समर्थन करत गावोगावी फिरू तरी शकल्या असत्या काय ?

समस्त स्त्रीयांकडून, पुरूषांकडून विशेषत: ब्राम्हण समाजाकडून या अपर्णाकाकूंचा तीव्र शब्दात निषेध झाला पाहिजे.

पुरूषभान

डॉ. कुंदा प्रनि यांच्या फेसबुक पोस्टवर आलेल्या पुरूष प्रतिक्रियांमधून मर्दानगी विरोधात निरोगी पुरूषभान उपक्रमाची आवश्यकता अधोरेखित झाली. न्या. रानडे वृध्दापकाळात अल्पवयीन मुलीशी पुनर्विवाह करतात आणि वंशाला दिवाच हवा असेल तर तूच का नाही पुनर्विवाह करत, असं ज्योतिबा फुले सावित्रींना विचारतात, इथे ज्योतीबांमधलं निरोगी पुरूषभान दिसतं.  स्त्रीयावरील अत्याचार रोखायचे असतील, तर सामाजिक दृष्टीकोन बदलावा लागेल आणि त्यात पुरूषांनी पुढाकार घेतला पाहिजे, हा विचार जगभरात स्वीकारला जाऊ लागला आहे. स्त्रीया चुकत नाहीत का ? चुकतात ना. स्त्रीच स्त्रीची शत्रू नसते का ? असते ना. पण स्त्रीयांच्या वर्तनावर, स्वभावावर, विचारांवर पुरूषप्रधानतेचा वर्षेनुवर्षे चालत आलेला प्रभाव आहे, हे दुर्लक्षून चालत नाही. पुरूषांचं सगळंच चुकतं का ? नाही, ज्योतीबा फुले, बाबासाहेब आंबेडकर आणि इतरही स्त्रीयांच्या प्रश्नांवर काम केलेले अनेक समाजसुधारक पुरूषच होते की !! ते हे काम करू शकले, कारण त्यांच्याकडे निरोगी पुरूषभान होते. दरम्यानच्या काळात राजकारणात समाजकारणात कडवटपणा आल्यावर, त्याला धर्मांधतेची जोड मिळाल्यावर मर्दानगीच्या व्याख्या बदलल्या. दंगलीत दुसऱ्या धर्माच्या स्त्रीयांवर बलात्कार करणं मर्दानगीत मोडलं गेलं. त्या बलात्काराचं समर्थन केलं गेलं, केलं जातं......कोणत्याही प्रकारच्या जातीय, धार्मिक तणावात, शत्रुत्वात स्त्रीयांना लक्ष्य केलं जातं. अगदी पुराणकाळापासून चालत आलंय. रामासारख्या आर्याला हिनवण्यासाठी सीतेचं अपहरण झालं आणि शूर्पणकेचं नाककान कापून रामानंही संकुचित पौरूषत्वच दाखवलं. अरूणा शानबागवरचा अत्याचारसुध्दा सोहनलाल वाल्मिकीची चोरीची तक्रार केल्यावरून बदला घेण्यासाठी झाला होता, हे लक्षात घेतलं पाहिजे. स्त्रीयांना भोगवस्तु समजून अपमानित करणारी मर्दानगी प्रवृत्ती निवडायची की विवेक जागृत ठेवणारं निरोगी पुरूषभान, हे प्रत्येकाने बौध्दिक कुवतीनुसार ठरवावे. निरोगी पुरूषभान ही संकल्पना आजची तातडीची सामाजिक गरज आहे. नव्या संकल्पनांवर टीका होणारच हे गृहीत धरून आपण आपलं शांतपणे काम करत राहावं. उगाच वैचारिक फुटाणे कुटण्यात वेळ दवडू नये !!!!

Sunday, 17 May 2015

कॉंग्रेसला पर्याय मिळाला का ?

सरसेनापतीसारखा पुढारी, सभासद , मुलभूत योजना व शिस्त यांचा समावेश असलेली संघटना, ध्येय, धोरण आणि तत्वज्ञान, कार्यक्रम, राजकिय डावपेच आणि मुत्सद्देगिरी या बाबींच्या समावेशातून पक्ष बनतो. विशिष्ट ध्येयवादाने प्रेरित होऊन मतदारांनी केलेली संघटना म्हणजे पक्ष अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी व्याख्या केली आहे. बाबासाहेबांच्या स्वप्नातील रिपल्बिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष कॉंग्रेसला पर्याय म्हणून निर्माण व्हायचा होता. देशातील छोट्या छोट्या पक्षाचं विलीनीकरण या एका पक्षात करून कॉंग्रेसला पर्याय अशी एकच संयुक्त आघाडी असावी , हा बाबासाहेबांचा प्रयत्न होता. आज रिपब्लिकन पक्षाचेच छोट्या छोट्या पक्षात तुकडे करून बाबासाहेबांचं स्वप्न पार धुळीला मिळवलं गेलं.

आपल्या स्वप्नपूर्तीसाठी बाबासाहेबांची देशातील ज्या ज्या प्रमुख व्यक्तींशी बोलणी सुरु होती, त्यात एक नाव होतं, राम मनोहर लोहिया. या लोहियांचे चेले मुलायम, लालू, नितीश वगैरे यंदाच्या निवडणुकीत पार लयाला गेले. समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता या तत्वांवर आधारित पक्ष बाबासाहेबांना अपेक्षित होता. लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनात क्रांतिकारक बदल रक्तविरहीत मार्गांनी घडवून आणणारी शासनपद्धती म्हणजे लोकशाही ही बाबासाहेबांची लोकशाहीची कल्पना. संविधानात्मक नीतिमत्तेच्या पालनावर बाबासाहेबांचा भर होता. बाबासाहेबांच्या स्वप्नातील कॉंग्रेसला पर्याय होईल असा पक्ष देशात उभा राहिलाच नाही.

आणीबाणीनंतर कॉंग्रेसचा सफाया झाला होता. इंदिरा गांधींनी ती सत्ता पुन्हा हस्तगत केली. त्यांच्या मृत्युनंतर राजीव गांधींना दोन तृतीयांशपेक्षा जास्त बहुमत मिळालं होतं. नंतरचा काळ मात्र आघाड्या सरकारांचा आला. आणि देशात प्रचंड अस्थिरतेची परिस्थिती निर्माण झाली. कॉंग्रेसने काहीच केलं नाही, असंही नाही. पण देशातील जनतेचा विश्वास संपादन करण्यात कॉंग्रेस असफल ठरत गेली. गेल्या दोन वर्षात त्यावर कळस चढला. लोकांना कॉंग्रेस नकोशी झाली. अशावेळी देशासमोर एकच पर्याय होता, भारतीय जनता पार्टी. १९५१ पासून नाना क्लुप्त्या वापरून विविध रुपात वावरूनसुद्धा वारंवार अयशस्वी ठरलेली भाजपा काही काळ सत्तेत आली. पुन्हा गेली. पण प्रयत्नांचं सातत्य आणि येनकेनप्रकारच्या खेळ्या याची फलश्रुती आज भाजपाला स्वबळावर स्पष्ट बहुमत देण्यात झाली आहे.

कॉंग्रेसला पर्याय मिळाला, पण तो आंबेडकरी विचारधारेला रुचणारा नाही. अर्थात, आजच्या नव पुरोगामी, धर्मनिरपेक्ष,  आंबेडकरी विचारधारेतही बाबासाहेबांना अपेक्षित देशातील सर्व समाजघटकांना सामावून घेणारा व्यापक दृष्टीकोन नाही, हीच मोठी अडचण आहे. संयम, समन्वयाचा अभाव, ध्येयाची अनिश्चिती आणि वैचारिक गोंधळ. या बाबी परिवर्तनाच्या लढाईतील अडथळे बनले आहेत. समाजकारण आणि राजकारण यांची गल्लत होते आहे. योग्य राजकीय पर्याय देण्याची जबाबदारी पार पाडली गेली नाही. त्यामुळेच देशापुढे जो पर्याय होता, तो कसाही असला तरी स्वीकारण्याची पाळी देशावर आली.

भाजपाच्या ओठात पोटात वेगळं असेलही, किंबहुना आहेच, पण कॉंग्रेसविरोधातील राजकारण करण्यात, देशातील सर्व समाजघटकांना आपली भूमिका गळी उतरवण्यात तो पक्ष यशस्वी ठरला आहे, हे सत्य नाकारून उपयोग नाही. आपल्याला आपल्याला देशातील हा राजकीय बदल खटकत असेल, तर समर्थ राजकीय पर्याय देण्याचीही  तयारी हवी. नुसता विरोधाला विरोध करून काहीही साध्य होणार नाही.

Sunday, 10 May 2015

पत्रकारांचा लढा

उल्हासनगरात आजही किती जातीयवाद आहे, हे गोलमैदानातील हॉल प्रकरणात पुन्हा एकदा दिसून आलंय. गोलमैदानातील काही भाग साधू वासवानी ट्रस्टला देण्यात आलाय. मोठा भाग प्रजापिता ब्रम्हकुमारीज ना देण्यात आलाय आणि पोलिस चौकीजवळील हॉल व प्रांगण मिडटाऊन रोटरी क्लबला देण्यात आलाय. टाऊन हॉल कुमारच्या ताब्यात आहे. सर्व ठिकाणी सिंधी भाषिकांचं वर्चस्व असलेल्या संस्था आहेत. त्यात पत्रकार संघटनांसारखी सिंधीभाषिक अल्पसंख्येने असलेल्या संस्थेला गोलमैदानातील हॉलसकट काही भाग देण्याची वेळ आली तर सिंधी समाजातील राजकीय नेत्यांच्या पोटात दुखू लागलं. आपल्या अशा राजकीय भुमिकांमुळे भाषिक, जातीय संघर्ष उभा राहतो, याचं भान मात्र या नेत्यांना नाही. त्यातच, सिंधेतर विशेषत: मराठी भाषिकांचं नेतृत्व कचखाऊ असल्याने, गल्लीबोळातील पडीक समाजमंदिरे सोडली, तर शहरातील एकही बडी वास्तु मराठी वा इतर कुठल्या सिंधेतर समाजाकडे नाही. याची ना कुणाला खंत, ना खेद !! सिंधेतर समाज असा सामाजिक राजकियदृष्ट्या निराधार असताना शिवसेनेसारख्या पक्षातील अंतर्गत मतभेद रोटरीवाल्यांच्या पथ्यावर पडणारे आहेत. अशा विषयात सिंधी समाज राजकीय, वैयक्तिक मतभेद विसरून एकत्र होतो, तो स्वभाव मराठी नेतृत्वाकडे नाही.  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या निधनाला अडीच वर्षे उलटली तरी अजून घोषित स्मारकाच्या हालचाली नाहीत. मग बाळासाहेब ठाकरे प्रेस क्लबसाठी उमाळा त्यांना कुठून येणार ? पत्रकारांना उल्हासनगरातील राजकीय सामाजिक स्थिती समजून घ्यायला पाहिजे. त्याहीपेक्षा प्रेस क्लबच्या हस्तांतरणात अडथळे निर्माण करणाऱ्यांना धडा शिकविण्याचा निर्धार पाहिजे. गोवा-लोणावळा ट्रीपवरच कृतकृत्य होणारी प्रवृत्ती असेल, तर ती फार काळ लढू शकणार नाही. तरीही, गेल्या काही वर्षांपासून उल्हासनगरातल्या पत्रकारांतही सामाजिक जाणीवेबाबत मरगळ आली होती. ती कुठेतरी झटकली जात आहे, हेही नसे थोडके. प्रेस क्लब हॉलच्या निमित्ताने सुरू झालेला आक्रमकपणा भविष्यात दीर्घकाळ टिकेल, अशी अपेक्षा आहे. शिवाजी पार्कवरील उपोषण आंदोलनास पाठींबा व हार्दिक शुभेच्छाही !!!