Monday, 29 August 2016

विरोध उन्मादाला !!!

*सण,उत्सवांना आलेलं विकृत स्वरूप मतांसाठीच्या राजकारणातून आलेलं आहे, त्यामुळे ते टिकवून ठेवण्यासाठी राजकारणी धडपडणारच !!!*

त्यांच्यामागे लागून आपण सण, उत्सवातला निखळ आनंद, बंधुभाव, संस्कृती गमावून बसायचं काय, हे जनतेने ठरवायला हवं.

*सजवलेल्या रश्शीवरून दहीहंडी क्रेनला लटकू लागली,*

*ढोलताशांची जागा कर्कश्य डीजेंनी घेतली,*

*पारंपरिक गीतसंगीताची जागा अचकटविचकट गाण्यांनी घेतली,*

*गोविंदा रे गोपाळा च्या जागी शांताबाई आली,*

*धार्मिक भावना, श्रध्दांचा लीलावी बाजार झाला,*

*उत्सवाच्या जागी उन्माद आला,*

*सणाचा जीवघेणा खेळ झाला,*

थर वाढत चालले आणि लहानग्यांचे जीव पणाला लावण्याइतपत राजकारणाचे थर खाली आले,

*तरी कसल्या परंपरेच्या बाता मारताेय आपण ?*

सर्वसामान्यांचं जीणं हराम करणारा, दैनंदिन जनजीवन विस्कळीत करणारा, वृध्द, बालके, रूग्ण यांना होणाऱ्या त्रासाची पर्वा न करणारा उत्सव, कोणत्याही जातीधर्माचा असो, त्यातला उन्माद मोडून काढायची जबाबदारी सर्वप्रथम सरकारची असते. सरकार अपयशी ठरलं, तर न्यायालय नाक खुपसणारच !!!

गोहत्याबंदी किंवा शहाबानो प्रकरणात आपण कोणीच असे म्हटले नव्हते, की न्यायालय नाक खुपसतंय !!!

न्यायालयाचे निर्णय म्हणजे स्वार्थासाठी ठेकेदारांच्या हितार्थ घेतलेले महापालिकांतील स्थायी समितीचे निर्णय वाटतात की काय राजकीय पक्षांना ?

सण,उत्सवांच्या आड इथली संविधानिक व्यवस्था मोडीत काढून धर्मव्यवस्थेला देशापेक्षा वरचढ ठरवायचा डाव, आपण जातपातधर्मभाषाप्रांत भेद विसरून हाणून पाडायलाच हवा. *अन्यथा बंद करा १५ ऑगस्ट नि २६ जानेवारीला तिरंग्यांचे प्रोफाईल फोटो लावणं !!!*

मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांची जर देशात खुली अवमानना व्हायला लागली, तर देशात अराजक यायला वेळ लागणार नाही. *ही अराजकता भारताचा पाकिस्तान करायला वेळ लावणार नाही !!!*



*विरोध उत्सवाला आणि त्यातल्या उत्साहाला नाही, उन्मादाला आहे, हे लक्षात घ्या.*

*राज असरोंडकर*
कायद्याने वागा लोकचळवळ

दुर्घटना नव्हेत, इशारे !!!!

*दुर्घटना नव्हेत, इशारे !!!*

धार्मिक उन्मादाचे, अव्यस्थेचे, बेफिकीरीचे, उदासीनतेचे अजून किती बळी हवेत ?
〰〰〰〰〰〰〰〰

१९९३ ला महानगर दैनिकात पत्रकारिता करीत असताना, सिंधी कुटुंबात गणपती ठेवलाय, म्हणून मी बातमी करायला गेल्याचं मला आठवतंय. ज्या कुटुंबाने गणपती ठेवला होता, त्याच्या प्रमुखाने मला सांगितलं की मुलाने खूप हट्ट केला, म्हणून बसवला गणपती !!!

पुढे मुलांचे हे हट्ट घराघरांतून पुरवले जाऊ लागले आणि ते गल्लीबोळात कधी झिरपले कळलंच नाही. उल्हासनगरात आता रोज गणपती येतात आणि रोज विसर्जित होतात. हौसेमौजेला गणपतीची प्रतिष्ठापना करणाऱ्यांनी इथली प्रशासकीय आणि सुरक्षा व्यवस्था जाम करून ठेवली आहे.

विशेषत: सिंधी समाजाचा उल्लेख यासाठी केला की सिंधी युवकांसाठी गणेशोत्सव म्हणजे एकप्रकारचं आर्थिक शक्तीप्रदर्शन असतं. याचा अर्थ इतर समाज फार शिस्तीत असतात, असं समजण्याचं कारण नाही.

मोठमोठ्या मूर्त्या, भडक रोषणाई, फटाक्यांची अमाप उधळण आणि कानठळ्या बसवणारे एकमेकांशी शक्तीप्रदर्शन करणारे डीजे यापलिकडे या गणेशोत्सवांमध्ये भक्तीभावाचा लवलेशही नसतो. आर्थिक मस्तीच्या जोरावर गणेश आगमनाची आणि विसर्जनाची मिरवणूक चौकाचौकात थांबवून वाहतूक कोंडी करण्यात या मंडळांना वीरता वाटते. या युवकांचे युथ आयकॉनही धांगडधिंग्यावर स्वार होऊन गुन्हेगारी राजकारण करणारे असल्याने मंडळांचा उन्माद आणि पोलिसांची हतबलता असं चित्र दरवर्षी गणेशोत्सव काळात पाहायला मिळतं.

कसलंही सामाजिक काय, वैयक्तिकही भान नसतं. अरूंद गल्लीबोळ, जागोजागचे खड्डे, चिखल, ओबडढोबड स्पीडब्रेकर्स, डोक्यावर कुठून कसंही गेलेलं आडवंतिडवं केबल आणि विद्युत तारांचं जाळं, बैनर्स, होर्डिंग्ज, पताका या सगळ्या बकाल अवस्थेतून वाट काढत या गचाळ शहरात यायला गणपतीला तरी कसं आवडेल, याचा विचार या उन्मादात कधी केला जात असेल का ?

दुर्घटना यापूर्वी घडल्या नाहीत, असं नाही, पण प्रत्येक वेळी लोकप्रतिनिधींनी मगरीचे अश्रु वाहायचे आणि स्वत:ची पापं झाकायची, लोकांनी त्याला वारंवार बळी पडायचं आणि वारंवार बळी जायचं व निवडणुकीत अव्यवस्थेला जबाबदार असणाऱ्यांनाच पुन्हा पुन्हा निवडून द्यायचं, असं चाललेलं आहे.

दुर्घटना घडतात, तर त्यात भविष्यकाळात सुधारण्यासाठी इशारेही असतात. पण मानवी जीवाची किंमतच आता कस्पटासमान झाली आहे. स्वार्थ, पैसा, चंगळवाद, धार्मिक उन्माद, हुल्लडबाजी यांना उधाण आलं आहे. त्यालाच लोक आता संस्कृती म्हणू लागले आहेत. या  तथाकथित संस्कृतीनेच सुजल गडापकर नावाच्या शाळकरी मुलाला दहीहंडी थरावर नेलं व पडून गंभीर जखमी केलं. जेएमडी ग्रुपच्या किशोरावस्थेतील दोन मुलांना वीजेचा धक्का लागून जीव गमावावा लागला. अजून किती बळी हवेत इथल्या अव्यवस्थेला, लोकप्रतिनिधींच्या बेफिकीरीला आणि लोकांच्या उदासीनतेला.

*जागे व्हा लोकहो, आपल्या घरातील प्रिय व्यक्ती गमावण्याच्या आधीच जागे व्हा !!!*


*राज असरोंडकर*
कायद्याने वागा लोकचळवळ

Friday, 19 August 2016

ट्रेनिंग स्कूल फॉर एन्ट्रन्स टु पॉलिटिक्स !!!

*ट्रेनिंग स्कूल फॉर एन्ट्रन्स टू पॉलिटीक्स*

उत्कृष्ट संसदपटू होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गुणांची या क्षेत्रात कार्य करणाऱ्या नेतृत्वात निर्मिती होण्याच्या दृष्टीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईत ट्रेनिंग स्कूल फॉर एन्ट्रन्स टू पॉलिटीक्स सुरु केले होते. बाबासाहेब स्वतः या संस्थेचे संचालक होते व शां. श. रेगे रजिस्ट्रार होते. देशातील लोकशाहीविषयक विचाराला आणि कार्याला परिणामकारक चालना मिळावी, त्याचप्रमाणे आपल्या नियोजित रिपब्लिकन पक्षामध्ये तरुणांची भारती व्हावी, ह्या हेतूने राजकारणात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी हे प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आले होते. जे विधिमंडळात कामकाज करण्याची महत्वाकांक्षा बाळगतात त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था या प्रशिक्षण केंद्रात बाबासाहेबांना करायची होती. शिक्षक होऊ इच्छिणारा मनुष्य आपल्या विषयात प्रवीण पाहिजे. त्याला उत्तम रीतीने व्याख्यान देता आलं पाहिजे, त्याचे व्यक्तिमत्व आकर्षक पाहिजे, विद्यालयाचा लौकिक शिक्षकाच्या कर्तुत्वावर आणि वक्तृत्वाच्या सामर्थ्यावर बराच अवलंबून असतो, असे बाबासाहेबांचे मत होते. १ जुलै ५६ ते मार्च ५७ पर्यंतच हे विद्यालय चालले. बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर पोरके होऊन ते बंद पडले. संसदीय संस्थेमध्ये सभागृहाला आपल्या सौम्य अथवा तीक्ष्म तर्कशुद्ध आणि माहितीपूर्ण भाषणाने जो सभासद भरून टाकू शकतो, तोच सभासद यशस्वी होऊ शकतो, हे बाबासाहेबांचे उद्गार....ट्रेनिंग स्कूल फॉर एन्ट्रन्स टू पॉलिटीक्स मध्ये राजकारण, अर्थशास्त्र, अंदाजपत्रक, कामगार संघटना, संसदीय कामकाजविषयक नियम आणि परंपरा इत्यादी आवश्यक विषयांबरोबर बाबासाहेबांनी वक्तृत्व साधनेला महत्व दिले होते. डिसेंबर ५६ मध्ये बाबासाहेब स्वतः या संस्थेत वक्तृत्वावर व्याख्यान देणार होते. पण त्यांच्या आकस्मिक परीनिर्वाणाने एका प्रभावी वक्त्याच्या मार्गदर्शनाला ती संस्था व तिथले उत्सुक विद्यार्थी मुकले...





*डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषणे या पुस्तकातून.*

प्रचार व प्रसार  : राज असरोंडकर
कायद्याने वागा लोकचळवळ

Wednesday, 17 August 2016

रक्षाबंधन

*कोणत्याही कृतीमागे प्रामाणिकता असेल, तरच त्यातून सकारात्मक फलश्रुती होते.*

रक्षाबंधन हा भावाबहिणीच्या पवित्र नात्याचा सण. भावाने बहिणीला दिलेली संरक्षणाची हमी. पण इथे बहिण भावाला राखी बांधत असल्याने बहिणीने भावाला संरक्षणासाठी
केलेली आर्जव म्हणू़या आपण !!!

प्रत्यक्षात हे भाऊ लोक बहिणींचं नेमकं काय संरक्षण करत असतात ? तर काही नाही !!! बहिणीने वेडंवाकडं वागू नये, यावर नजर ठेवण्यासाठीची भाऊ ही एक व्यवस्था आहे. नजर चुकवून बहिण काही वेडंवाकडं वागलीच, तर तिला क्रूरपणे संपवण्यासाठीही केलेली भाऊ ही सामाजिक व्यवस्था आहे.

इथे भाऊ वेडावाकडा वागला तर नजर ठेवण्याचा अधिकार बहिणींना वयाने मोठी असली तरी दिलेला नाही.

बरं संरक्षणाची हमी म्हणजे फक्त आपल्याच बहिणीच्या संरक्षणाची हमी का ? मग इतरांच्या बहिणींच्या किंवा ज्यांना भाऊच नाही, अशा बहिणींच्या संरक्षणाची हमी कोणी घ्यायची ?

नाक्यानाक्यावर उभं राहून मुलींना छेडणारे, शेरेबाजी करून जिणं मुश्कील करणारे भाऊ, शाळाकॉलेजांतील मुलींचा त्यांच्या मनाविरूध्द भयावह पाठलाग करणारे भाऊ, बलात्कार करणारे भाऊ, बलात्कारावेळी अन्यायअत्याचारांची परिसीमा गाठत मुलींची हत्या करणारे भाऊ, या सगळ्या भावांतलं भाऊपण जातं कुठे ? ते रक्षाबंधन किंवा भाऊबीजेच्या दिवसांपुरतंच मर्यादित इतकं ढोबळ कसं असू शकतं ? आणि हे भाऊ जेव्हा समाजात स्त्रियांना नामोहरम करतात, तेव्हा इतर भाऊ नेमकी काय भुमिका निभावत असतात ?

*वास्तविक, रक्षाबंधन करताना, स्त्रियांनी भावाला, माझी जशी काळजी करतोस, तशी समाजातल्या सगळीच मुलींची कर, असं आवर्जून सांगायला हवं.*

*तसं झालं तरच, मला मुक्तपणे वावरता येणार आहे. मनमोकळं जगता येणार आहे. माझे निर्णय घेताना ते तुझ्याशी निरोगी चर्चा करून घेता यावेत, असं आपुलकीचं, जिव्हाळ्याचं नातं आपल्यात असलं पाहिजे. माझं आत्मभान तुला मान्य करता आलं पाहिजे. केवळ स्वत:च्या तथाकथित सामाजिक प्रतिष्ठेसाठी नव्हे, तर माझीही व्यक्तिगत प्रतिष्ठा जपण्यासाठी तुझं पाठबळ हवं. माझंही माणूस म्हणून स्वतंत्र अस्तित्व तू मान्य करायला हवंस. तुला असलेलं व्यक्तिगत स्वातंत्र्य मलाही असलं पाहिजे, म्हणून माझ्या पाठीशी उभा राहा. केवळ बहिण म्हणून नव्हे, तर माणूस म्हणून जगण्याचा माझा अधिकार तू मान्य केला पाहिजेस आणि तुझ्यावरच अवलंबून न राहता, मलाच माझं स्वत:चं संरक्षण प्रसंगी करता आलं पाहिजे, असं सक्षम घडण्यासाठी मला पूरक साथ दे, असं आज बहिणीने भावांना सांगितलं पाहिजे.*

रक्षाबंधन हा सण भाऊबहिणींच्या रक्ताच्या नात्यातून जन्माला आलाय, असे संदर्भ पुराणात, इतिहासात कुठेच नाहीत.

बळीराजाशी कपटीपणा करायला गेलेल्या विष्णूला बळीने बुध्दिमतेच्या जोरावर अडकवून ठेवले, तेव्हा लक्ष्मीने सोयीस्कररित्या बळीला हातात धागा बांधून बळेच भाऊ मानले व त्याबदल्यात विष्णूची सुटका करून घेतली, असा एक संदर्भ आहे.

सूर आणि असूरांच्या लढाईत इंद्राचा विजय व्हावा, म्हणून इंद्राणीने त्याला हातात धागा बांधला, हा संदर्भ भावाबहिणीतील नसून पतीपत्नीतील आहे.

इतिहासकाळात लढाईत पराभव होत असताना, पुढचा अनर्थ टाळण्यासाठी एका राजाच्या पत्नीने दुसऱ्या राजाला सोयीस्कररित्या भाऊ मानल्याचं आपल्याला दिसतं.

भावाबहिणीतील नातं पवित्रच असतं. पण रक्षाबंधन हा सण त्या पवित्रतेतून सुरू झालाय, असं दिसून येत नाही. म्हणूनच तो सामाजिकदृष्ट्या जबाबदार, दीर्घकालीन ठाम भाऊ घडवत नाही. रक्षाबंधन करणारा भाऊ रक्षाबंधनादिवशीच संपतो. त्यानंतर असतो, तो फक्त पुरूष. स्वत:च्या बहिणीसकट समस्त स्त्रियांना आपल्या नजरकैदेत ठेवू पाहणारा, त्यांचं माणूस म्हणून अस्तित्व नाकारणारा पुरूष.

हे चित्र बदलायला हवं. बहिणीने भावाला हातात धागा बांधल्यावर भावानेही बहिणीच्या हातात धागा बांधण्याची प्रथा सुरू व्हायला हवी.

*फक्त तुलाच नाही, तर समाजातील सर्वच स्त्रियांना संरक्षणाच्या मेहेरबानीची गरजच लागणार नाही व  मुक्तपणे वावरता येईल, असं निकोप सामाजिक वातावरण तयार करण्याची मी हमी देतो, असं भावाने बहिणीला सांगितलं पाहिजे.*

सण, उत्सव हे व्यापाऱ्यांचा धंदा व्हावा, म्हणून रूढींमागे फरफटत जावून पार पाडावयाचे उपचार ठरता कामा नयेत. जातीधर्मभाषाप्रांतांच्या पलिकडे माणुसकीची नाती निर्माण करण्यासाठी, एक चांगला समाज घडवण्यासाठीही सणउत्सवांचा वापर बदलत्या काळानुसार झाला पाहिजे.

कारण,

*माणूसपण जपणारं*
*मन तितकं मोठं असतं,*
*आपुलकीचं नातं खरं*
*बाकी सगळं खोटं असतं !!*


*राज असरोंडकर*
कायद्याने वागा लोकचळवळ

ध्वनी प्रदुषण

ध्वनी प्रदुषणामुळे लहान मुलांना बहिरेपण येतं, डोकेदुखीचा त्रास होतो, मुलं चिडचिडी होतात, गरोदर महिलांच्या पोटातील गर्भावर विपरित परिणाम होतात, वयोवृध्द, आजारी रूग्णांना मनस्ताप होतो, पण आजवर हा गुन्हा करणाऱ्यांना कोणत्याही धार्मिक संघटनांनी जाऊन मारझोड केल्याचं ऐकीवात नाही...हे सगळे त्रास नेमके कोणत्या धर्मियांना सर्वाधिक होतात, कोणास काही कल्पना आहे का ?