माझा एक मित्र गणपतीचा निस्सीम भक्त आहे.
घरातल्या देव्हाऱ्यात गणपतीचा हाताच्या पंज्यावर मावेल, एवढा फोटो आहे, त्याला रोज सकाळी नमस्कार केल्याशिवाय, तो घराबाहेर पडत नाही.
रात्री झोपण्यापूर्वी नमस्कार केल्याशिवाय, अंथरुणात शिरत नाही.
काल भेटायचं ठरलं, तर मी म्हटलं, माघी गणपतीत बिजी असशील !!!
तर तो म्हणाला, नाही रे. मी काही करत नाही, कुठले उत्सवबित्सव. आणि कुठे जातही नाही.
तो म्हणाला, तुला विश्वास बसणार नाही, पण मी टिटवाळा, सिध्दिविनायक, दगडुशेट अशा स्पेशल गणपतींचंही कधी दर्शन करत नाही. केलेलं नाही.
तो म्हणाला, तू मान अथवा नको मानू, पण माझी गणपतीवर पूर्ण श्रध्दा आहे. मी आज जो काही आहे, तो गणपतीमुळेच आहे. तो घरात मनोभावे साधा नमस्कार केला तरी पावतो, याचा मला विश्वास आहे.
मग इतके लोक जे मंदिरांत रांगा लावतात, नवस, उपासतापास करतात, त्यांचं काय, असं मी विचारलं, तेव्हा तो म्हणाला, या लोकांचा स्वत:वरही विश्वास नाही आणि देवावरही नाही. असले लोक स्वार्थासाठी शंभर देवांना पुजतात, देव, मंदिरं बदलत राहतात. याच लोकांनी देवधर्माचा तमाशा करुन टाकलाय.
मी घरातला गणपती तरी का पुजतोस, असा प्रश्न माझ्या मित्राला विचारला नाही. तसा तो विचारणंही संयुक्तिक नव्हतं. तो विवेकी मार्गावरचाच प्रवासी आहे, हे मी समजून घेतलं होतं.
भारतीय संविधानाने प्रत्येक व्यक्तिला धर्म आणि उपासना यांचं स्वातंत्र्य दिलंय. तसे ते माझ्या मित्रालाही होतं. किमान अशा मित्रांच्या तरी श्रध्दा दुखावू नयेत, असं माझं ठाम मत आहे.
- राज असरोंडकर
कायद्याने वागा लोकचळवळ
No comments:
Post a Comment